शनिवार, १० एप्रिल, २०२१

संवेदनशील मनाचा संयत आविष्कार : ऋतुरंग

 

 

 संवेदनशील मनाचा संयत आविष्कार  : ऋतुरंग 

 

 डॉ.बी.एम.हिर्डेकर यांचा ‘ऋतुरंग’ नामक कवितासंग्रह अलीकडेच भाग्यश्री प्रकाशन ने प्रकाशित केला आहे. डॉ.हिर्डेकर यांनी शैक्षणिक क्षेत्रात अनेक वर्षे प्राध्यापक, प्रशासक म्हणून भरीव काम केलेले आहे, करत आहेत. त्यांनी आपल्या कवितांमध्ये बळीराजा, मजूर, कष्टकरी,महिला,उसतोड कामगार,सामान्य जनता इत्यादींचे प्रश्न, दु:ख, व्यथा, वेदनांना अभिव्यक्त केले आहे.त्यांचे गेल्या चार-पाच दशकातील जीवनानुभव आपणास त्यांच्या या कवितांमधून कलात्मक पद्धतीने शब्दबद्ध झालेले दिसून येतात.जीवन जगत असताना कवी आजूबाजूला घडणाऱ्या बऱ्या-वाईट विविध प्रसंगातून,अनुभवातून जात असतो. संवेदनशीलतेमुळे तो आपल्याबरोबर इतरांच्या सुख-दुःखात सामील होत असतो. कर्जबाजारीपणामुळे बळीराजाच्या नशिबी आलेले दु:ख, सरकारची चुकीची धोरणे व फुसक्या घोषणा त्यांच्या कवितेतून व्यक्त होतात. आपण पाहतो की बळीराजाला अनेक संकटांचा सामना करावा लागतो. अवकाळी पाऊस, दुष्काळ, त्याचबरोबर कर्जापायी झालेली त्याची झालेली दयनीय परिस्थितीनव्या जुन्याचा खेळ बाबाही कविता अधोरेखित करते.

‘नव्याजुन्यात बळीराजा अडकलेला

 सरकार, पाऊस, वीजवाला, अडतवाला 

सरकारी घोषणांचा फक्त गाजावाजा 

सारेच वाजिवत्यात त्याचा बेंडबाजा’

याबरोबरच अवकाळी पाऊस बळीराजाचे कसे जीवघेणं नुकसान करतो हे ‘पाऊस असा’ या कवितेत स्पष्ट झाले आहे. डॉ.हिर्डेकर यांच्या कवितांमध्ये शेतकऱ्यांच्या वेदनांना अभिव्यक्त केलेले दिसून येते.‘कष्टाचा भाव’ ही एक लघु कविता आहे पण अतिशय मार्मिक आहे.काम आमचे दाम तुमचेकविता कष्टकरी, मजूर वर्गाच्या व्यथांचे, वेदनेचे आतड्याला पिळवटून टाकणारे चित्रण करते.कारागीर वाऱ्यावरही कविता कामगार, कारागीरांची कोरोनामुळे झालेली दयनीय स्थिती, सरकारची चुकीची धोरणे,नीती यावर कडाडून टीका करते.मोल माझ्या श्रमाचे मातीमोल ठरवू नकाअशी कळकळीची विनंती करते.तू फक्त नाचही कविता आजचे शिक्षण वास्तव अधोरेखित करते-

‘शिकणारे मुजोर ,   शिकविणारे कमजोर

नेमणारे  चोर ,  वरिष्ठ कामचोर

हाताखालचे चोरावर मोर , तरी म्हणत्यात नाच रे मोरा नाच’

महिलांवर पिढ्यानपिढ्या होणारे अन्याय, अत्याचार तसेच तिला उपेक्षित, दुर्लक्षित ठेवणे, दुय्यम स्थान देणे हे समाजवास्तव रामाच्या राज्यातनावाची  कविता व्यक्त करते. मग कवी प्रश्न करतात की ‘रामाच्या राज्यात सीता का हो वनवासी? ‘चेहरेकविता चेहऱ्यामागचे ‘चेहरे’ उजेडात आणते. निर्दयी मुलाच्या संवेदनाहीनतेमुळे  मायबापाच्या  दयनीय अवस्थेचे चित्रण ‘पुत्र व्हावे ऐसे उफराटे, काळीज हे फाटल फाटे’ हे आजचे वास्तव माय बाप झाले दीनकविता व्यक्त करते.‘पाणी, वाणी, नाणी शहरात सगळच लागलय नासायला’ म्हणत ‘या शहरांचं काय करायचं?’ ही कविता शहरातील प्रश्न चव्हाट्यावर आणते.‘पक्षांनीही घेतले मोकळे श्वास’म्हणत कोरोनामुळे लॉकडाऊन मुळे प्रदूषण, गोंगाट, अतिरेक कमी झालाअतिरेकाचा अंतही कविता व्यक्त करते.जाती-धर्माच्या भिंती छेदून निव्वळ माणूस म्हणून जगता आले पाहिजे.जगता येते आनंदानेही माणूसपणाची जाणीव करून देणारी कविता दिशा देते मानवताधर्म शिकवते ‘वसुधैव कुटुम्बकम’ शिकवते. व्यापक उदात्त दृष्टिकोन देते. कवी  म्हणतात- 

‘जगता येते सोडून जात पात,

करता येते कर्म सोडून आपला धर्म’

बॉडी’  कविता मानवी जीवनाची क्षणभंगुरता, नश्वरताअहंकार अधोरेखित करते. प्रतिमांमध्ये जगता कामा नये पद. पैसा यांची क्षणभंगुरता अधोरेखित करते. शेवटी कवी म्हणतात ,आम्ही माणूस कधी झालोच नाही.आज सर्वकाही ऑनलाइन झाले आहे. आभासी जगात वावरणार्या या दुनियेत खरी नाती उरलीच नाहीत. ही सल कवी आभासी जगया कवितेत व्यक्त करतात- 

‘आभासी जगात, नभाची नाते उरलेच नाही

 नुसतेच पळणे , घामाने गळणे राहिलेच नाही’

यातील अनेक कवितांचा सूर मानवतावादी आहे. माणुसकीचा आहे.कवी मानवता धर्म आपल्या कवितेतून व्यक्त करतात.माणुसकीचा झराया कवितेत ते म्हणतातमानवता हा एक धर्म खरा, माणुसकीचा निर्मळ वाहू दे झरा’. करुणेचा झराया कवितेत कवी आपल्या आई विषयीच्या भावना व्यक्त करतात.तिच्या वाटी आलेलं दुःख, व्यथा-वेदनामुळे कवीचे मन कासाविस होतं. तिच्या वाट्याला आलेले भोग, दुःख यांनी कवीच्या मनात प्रश्न पडतात-

 मनोभावे निरपेक्ष देवपुजा तिने केली

 तरी सजा कपाळी तिच्या कोणी लिहिली?’

एकूणच‘ऋतुरंग’ मधील कविता आपणास अंतर्मुख करतात. त्याचबरोबर जीवन जगण्यासाठी दिशा देतात. समृद्ध करून जातात. सामाजिक,शैक्षणिक,सांस्कृतिक इत्यादी विविध क्षेत्रातील प्रश्नांचा, समस्यांचा विस्तृत आशय असलेलेया या कवितांमध्ये भावगर्भता, विचारगर्भता दिसून येते. साध्या, सहज, सरळ शब्दात पण मनाचा वेध घेणारी कवीची शैली वाचकाला विचार प्रवृत्त करते. माणसाला माणूसपणाची जाणीव करून देते.  एकूण 107 कविता या काव्यसंग्रहात समाविष्ट आहेत. त्या श्रमिकहो, समाजभान, ‘तीच्या शक्तीचा जागर, सृजन, शिक्षण, करुणेचा झरा, जिव्हाळा अशा विविध भागात विभागल्या गेल्या  आहेत. प्रत्येक भागाच्या प्रारंभी महान व्यक्तींच्या काही ओळी आहेत व त्याचबरोबर चित्रे (स्केचेस) आहेत.डॉ रणधीर शिंदे यांनी आशयघन ब्लर्ब लिहिला आहे तरडॉ.रघुनाथ  कडाकणे यांनीडॉ हिर्डेकर यांच्या व्यक्तिमत्वाचा आणि कवितांचे विवेचन व विश्लेषण करणारी प्रस्तावना लिहिली आहे.आकर्षक आणि बोलके मुखपृष्ठ विजय टिपुगडे यांनी रेखाटले आहे.सदर काव्यसंग्रह मराठी साहित्य वैभवात मोलाची भर घालणारा आहे हे मात्र निश्चित .....!


पुस्तकाचे नांव : ऋतुरंग (कवितासंग्रह)

लेखक  :डॉ.बी एम हिर्डेकर 

प्रकाशक: भाग्यश्री प्रकाशन, कोल्हापूर 

पॄष्ठे : 152

किंमत:150 रू

 




शुक्रवार, २६ मार्च, २०२१

जीवनाला दिशा देणारे ‘भवन’

 

जीवनाला दिशा देणारे ‘भवन’

            सन् 2002 ला शिवाजी विद्यापीठाच्या हिंदी विभागात एम.ए. साठी प्रवेश घेतला. आर्थिक परिस्थिती अत्यंत  हालाखीची असल्यामुळे डॉ. आप्पासाहेब पवार विद्यार्थी भवन-’कमवा व  शिका’ योजनेमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी अर्ज केला.मग मुलाखत झाली.प्रवेश मिळाला. विशेषत: कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यातून उच्च शिक्षणासाठी विद्यापीठात आलेली व हालाखीची आर्थिक परिस्थिती असलेल्या मुलांनी भवनाला प्रवेश घेतला होता. वेगवेगळ्या जिल्ह्यातून, महाविद्यालयातून आलेल्या आम्हा मुलांची भवनमुळे राहण्या-खाण्याची चांगली सोय झाली. परीक्षा फी व इतरही सुविधा मिळत राहिल्या.भवनमध्ये आम्हाला दररोज तीन तास काम असायचे. त्यामध्ये मेसमध्ये वाढपी,मैनेजर म्हणून, ग्रंथालयात पुस्तके इस्यू करणे तसेच पिठाची गिरणी चालविणे, झेरॉक्स मशीन चालविणे इ.कामे भवन मध्ये आम्हाला करावी लागत. हळू-हळू आम्ही मुले जिवाभावाने राहू लागलो. आमच्यात अतूट असे नाते तयार झाले. बघता-बघता आमच्यात मैत्रीभाव वाढत गेला. एक जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले. आम्ही 'भवनबंधु' कधी झालो हे कळले देखील नाही. भवनमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी काम करताना अनेक अनुभव आले व ते भविष्यासाठी उपयोगी पडले. विशेषत: झेरॉक्स सेंटर मध्ये, ग्रंथालयमध्ये, मेसमध्ये काम करताना विविध विद्यार्थ्यांशी, लोकांशी ओळखी झाल्या. संवाद कौशल्य वृद्धिंगत झाले. आर्थिक व्यवहार सांभाळता यायला लागले, स्वभाव संयमी झाला. परिश्रमाचे महत्व समजू लागले. स्वभावातला संकोच कमी व्हायला लागला. व्यक्तिमत्व विकास होण्यास मदत झाली. जबाबदारीची जाणीव निर्माण झाली. तसेच भवनमध्ये इतर सिनियर,समवयस्क मित्र स्पर्धा परीक्षा, सेट-नेट, बँकिंग, सी.ए. इ.चा अथकपणे बारा-बारा,चौदा-चौदा तास अभ्यास करणारे मित्र लाभले. त्यांच्याकडून प्रेरणा मिळत राहिली. आपणही ‘काहीतरी करायला हवे’ असे वाटू लागले. महाविद्यालयामध्ये भरकटलो होतो त्याला एक स्थिरता प्राप्त झाली. जीवनाचे ध्येय निश्चित झाले. अभ्यासासाठा 18 तास विद्यापीठाचे ग्रंथालय उपलब्ध झाले. त्याचबरोबर पुस्तक वाचनाची गोडी लागली. विविध विषयावरची पुस्तक वाचू लागलो. आत्मचरित्र, कादंबरी प्रेरणादायी पुस्तके वाचू लागलो. डायरी लेखन करू लागलो. चांगल्या सवयी लागत गेल्या. वेळ सार्थकी लागू लागला. जीवनाला दिशा मिळत गेली. विभागातील तसेच प्रशासकीय कार्यालयातील ज्येष्ठांच्या अनुभवाचा फायदा होत गेला. स्वावलंबी शिक्षणातून आत्मविश्वास येत गेला. दिवसेंदिवस तो वृद्धिंगत होत राहिला.

             विद्यापीठातील इतर विभागातील अनेक मित्र मिळाले. त्यांच्याशी विचारांची देवाण-घेवाण होत राहिली. त्याचा फायदा होत गेला.त्यातून दिशा मिळत राहिली. भवनच्या सिनियर विद्यार्थ्यांचा दबाव रहायचा पण तरीसुद्धा त्यांच्याकडून ही भरपूर शिकायला मिळाले. प्रेरणा मिळाली. समवयस्क, समविचारी,समध्येयी मित्रांचे ग्रुप तयार झाले. अभ्यासाला दिशा मिळत गेली. अभ्यासात सातत्य राहू लागले. वेळेचा सदुपयोग होत होता. दिवसभरचे रुटीन व्यस्त होते. आम्ही विद्यार्थी तीन तास काम, विभागातील लेक्चर्स व संध्याकाळी अभ्यास करू लागलो. नियमितपणे व्यायाम, खेळ खेळत राहिलो. त्यामुळे फिट राहिलो. मनी स्वप्ने घेऊन आलेलो आम्ही बॅं.बाळासाहेब खर्डेकर ग्रंथालय असो की प्लेन इमारत की भवनमधील रूम सगळीकडे नियमितपणे अभ्यास करीत राहिलो. अभ्यासाला पर्याय ठेवला नाही. डिपार्टमेंटची लेक्चर्स करीत राहिलो, राजर्षी शाहू सभागृहात संपन्न होणारे कार्यक्रमांना उपस्थित राहिलो, विविध क्षेत्रातील नामवंत वक्त्यांना ऐकले. समृध्द झालो. विभागात होणारी व्याख्याने, कार्यक्रम यामुळे समद्ध होत राहिलो. विचाराना दिशा मिळत गेली. पहिल्या वर्षी आम्हाला भवन चे रेक्टर म्हणून डॉ.व्ही.बी. ककडे सर होते. त्यांचे वेळेचे नियोजन असेल किंवा नेमके आणि मोजकेच पण महत्वाचे बोलणे असेल. एकूणच त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आमच्यावर खूप प्रभाव पडला. तर दुसर्या वर्षी रेक्टर डॉ. डी.टी.शिर्के सर होते. त्यांची कामातील शिस्त असेल, आमचे प्रश्न सोडविणे असेल हे खूप प्रभावित करून गेले. त्यांच्याकडून खूप काही शिकता आले. त्यांची काम करण्याची पद्धत जवळून बघता आली.

शिवाजी विद्यापीठात एम.ए. हिंदी विषयात प्रथम क्रमांक प्राप्त केल्याने मला जवळ-जवळ चाळीस हजार रूपये इतकी स्कॉलरशिप मिळाली. या पैशाच्या आधारे मी पुढे नेट-सेट च्या परीक्षा दिल्या. भवन ने दिलेला आत्मविश्वास, अविरतपणे कष्ट करण्याची तयारी, अभ्यासातील सातत्य इत्यादीच्या जोरावर यश संपादन केले म्हणजेच ‘सेट’ ची परीक्षा मी पास झालो. दोन वर्ष तासिका तत्वावर (सी.एच.बी) नोकरी केली. पुढे महाविद्यालयात ‘सहायक प्राध्यापक’ पदावर पर्मनंट झालो. भवन ने आम्हाला आमच्या पायावर उभे केले. भवन ने उच्च शिक्षण घेण्याची संधी दिली.आत्मविश्वास दिला, आयुष्याला दिशा, स्थिरता दिली. स्वावलंबी शिक्षणाचे धडे दिले. संस्कार दिले. भवनमुळे ज्या सुविधा आम्हाला मिळाल्या त्याचा आम्ही आमच्या करियरसाठी पुरेपूर वापर केला व आमचे ध्येय आम्ही साध्य केले, ज्या भवन ने आम्हाला शिस्त दिली, जिवाभावाची माणसे दिली, सुसंस्कार दिले, आम्हाला घडविले. आमचे प्रश्न सोडविले. आधार दिला. मायेची सावली दिली, आर्थिक प्रश्न सोडविले, पाठबळ दिले, जगण्याची नवी प्रेरणा आणि उर्जा दिली, जगण्याचे बळ दिले. अशा भवनला सोडताना आम्हाला दाटून आले. कारण भावनिक बंध तयार झाले होते. आपुलकीचे, जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले होते. पण भवन सोडण्याशिवाय गत्यंतर नव्हते.

आज मागे वळून पाहताना वाटते की डॉ.आप्पासाहेब विद्यार्थी भवन ने आयुष्याला कलाटणी दिली आहे. आज भवन सोडून अठरा वर्षे झालीत. मनुष्याला जीवनात अनेक माणसे, परिस्थिती, प्रसंग समृद्ध करीत असतात. पण आमच्या जीवनात या सर्व गोष्टीबरोबरच भवन मुळे क्रांती झाली हे मात्र निश्चित. स्वामी विवेकानंद म्हणतात की  "मन,मनगट आणि मेंदूच्या संतुलित विकास शिक्षण आहे" त्याप्रमाणे आमच्या मन, मनगट आणि मेंदूच्या विकासासाठी अनुकूल असे वातावरण भवनने दिले.आज आमचे भवनबंधु विविध क्षेत्रात आपल्या कार्यकर्तुत्वाचा झेंडा अभिमानाने मिरवित आहेत. प्रवीण अमेरिकेत शास्त्रज्ञ आहे. प्रकाश, मोहन,सचिन गोव्यात सिपला कंपनीत चांगल्या पदावर कार्यरत आहेत. रमेश नायब तहसीलदार आहे. आनंद पी.आय. आहे. विशाल बँकेत तर अंकुश एस टी मध्ये चांगल्या पदावर काम करत आहेत. परशुराम ‘नवोदय’ मध्ये शिक्षक म्हणून मिरवतो आहे.शंकरगोंडा वकील आहे. अरविंद, अनिरुद्ध, शहाजी, सुखदेव, दामाजी, निलेश, विठ्ठल, श्रीकांत, शरद, महेश, समाधान, मी विविध महाविद्यालयामध्ये सहायक प्राध्यापक म्हणून शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात कार्यरत आहोत. आमच्या बॅचचे आम्ही जवळजवळ ७० जण वेगवेगळ्या क्षेत्रात काम करीत असून स्वतःच्या पायावर स्थिर झालो आहोत. या गोष्टीचे श्रेय भवनलाच जाते.

आज जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा  लक्षात येते की आपल्यावर जे श्रमाचे संस्कार झालेत त्यामुळेच आपण काही तरी करू शकलो. माझ्यासारख्या सामान्य पण होतकरू मुलांच्या जीवनाला आकार देण्याचे ते घडविण्याचे काम भवनने केले. कारण परिस्थितीने पिचलेल्या माझ्यासारख्या हजारो विद्यार्थ्यांसाठी आधारवड भवन आहे. भवन दिन दलितांचा, गोर गरीबांचा कैवारी आहे. निवारा आहे.आसरा आहे.पंढरी आहे.जीवनाला कलाटणी देणारे आहे. मी आज जो काही आहे त्याचे श्रेय भवनला अर्पण करतो.आज आम्ही पदवीच्या मुलांना आत्मविश्वासाने अभिमानाने सांगतो की ‘आम्ही भवनचे विद्यार्थी आहोत’. मुलंही त्यातून प्रेरणा घेतात. काहीतरी करायचे म्हणतात.त्यांच्या चेहर्यावरती काही तरी करण्याची उर्मी  दिसते. बर वाटत. शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ आपासाहेब पवार यांनी तळागळातल्या समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी भवन सारखा सक्षम पर्याय उपलब्ध करून दिला त्याबद्दल त्यांच्या चरणी मी वंदन करतो.

- प्रा.शौकत आतार


 

 

 

शनिवार, २० मार्च, २०२१

'मोबाईल' वर बोलू काही…

 'मोबाईल' वर बोलू काही…                                      mobile-phone-addiction jpg


आधुनिक काळात माणसाच्या जीवनात शिक्षण, सभ्यता, विज्ञानाचा प्रवेश झाला. विज्ञानाच्या जोरावर माणसाने नव-नवे शोध लावले. माणूस दिवसेंदिवस भौतिक विकास करत गेला. मग नवनवं तत्रज्ञान आलं. इलेक्ट्रीक, इलेक्ट्रॉनिक नवइलेक्ट्रॉनिक साधने आली. कम्प्यूटर, इंटरनेट आलं. डिजिटल प्रसार माध्यमांचा विकास होत गेला. मोबाईल क्रांती झाली. मोबाइल अँड्रॉइड स्वरूपात आला. मोबाइलमध्ये इंटरनेट आले. गुगल, गुगल क्रोम, मोझिला फायफॉक्स सारखे ब्राऊजर्स आले. फेसबुक, व्हॉटसअप, यूटयूब तत्सम अनेक अप्लिकेशन्स आली. येताहेत. या सर्वांच्या मदतीने माणसाला इंटरनेटवरील माहितीचे विशाल भांडार खुले झाले. माणूस इंटरनेटच्या सहायाने कधीही, कुठेही, कितीही माहिती प्राप्त करू लागला. अन बघता-बघता 'कर लो दुनिया मुट्ठी में' प्रमाणे माणसाच्या मुट्ठीत सारं जग आलं. दिवसेंदिवस नवनवें शोध लागताहेत. तंत्रज्ञान प्रगती करतेय. माहिती तंत्रज्ञानाने मनुष्याच्या दैनंदिन व्यवहारात कमालीची गती आणलीय. आज अनेक गोष्टींचे बुकिंग घरबसल्या ऑनलाइन होतय. आज विविध भाषांमधील बरीच दैनिक वर्तमानपत्रे, साप्ताहिके, पाक्षिके, मासिके . नियतकालिके तसेच पुस्तके इंटरनेटच्या माध्यमातून आपण कधीही, कुठेही आपण वाचू बघू शकतो. 'स्टोरीटेल' सारख्या अप्लिेकशन्सच्या माध्यमातून आपण पुस्तके ऑडिओ स्वरूपात ऐकू शकतो. अर्थात माहिती मिळविण्यासाठी स्थळ, काळ, वेळेची मर्यादा राहिलेली नाही. आज झपाटयाने बदलत चाललेल्या या जगात आपणास टिकून राहण्यासाठी तंत्रज्ञान साक्षर असणे ही काळाची गरज बनली आहे. गुगलने माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज बहुतांश लोक आपले प्रश्न, जिज्ञासा, शंका गुगलवर टाइप करताना दिसताहेत. 'क्वोरा' सारखी अप्लिकेशन्स अशा प्रश्नांची उत्तरे देताहेत. कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, कॄषी, स्थापत्यशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र . पैकी कोणतीही विद्याशाखा असो किंवा सामाजिक, राजकीय, सांस्कॄतिक, ऐतिहासिक, साहित्यिक . पैकी कोणतेही क्षेत्र असो, पण गुगल ने या सर्वातील माहितीचा, ज्ञानाचा प्रचंड मोठा अविश्वसनीय असा संग्रह जगभरातील इंटरनेट वापरकर्त्यांना चोवीस तास उपलब्ध करून दिला आहे.त्याचबरोबर यूटयूब च्या माध्यमातून आपणास प्रचंड मोठे माहितीचे, ज्ञानाचे दालन खुले झाले आहे. जगभरातील विविध भाषा तसेच क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींचे व्हिडीओ आपण चोवीस तास कधीही, कुठेही बघू, ऐकू शकतो.

पण हे जरी खरे असले तरी काही माणसे या माहिती तंत्रज्ञानाच्या, इंटरनेटच्या, सोशल मिडियाच्या विश्वात इतकी रमत गेलीत की त्यांना या गोष्टीचे 'अडिक्शन' झालय. काहीजण फेसबुक, व्हाटसअप, यूटयूब, टिकटाक . अप्लिकेशनमध्ये तासनतास अव्याहतपणे डोकं खुपसून बसताहेत. मनोरंजनाच्या नावाखाली आपल्या आयुष्यातील किंमती वेळ ते यामध्ये खर्च करताहेत. एकदा का या गोष्टींची सवय लागली की मग जडलेली सवय सोडणं कठीण होऊन बसतं. अशां अडिक्टेड लोकांमध्ये सर्व वयोगटातील व्यक्तींचा कमी अधिक प्रमाणात समावेश आहे.खरं म्हणजे अँड्रॉइड  मोबाईलचे फायदे,तोटे आहेत. वास्तविक पाहता कोणत्याही गोष्टीला सकारात्मक, नकारात्मक बाजू असतात हे वेगळ सांगायला नको. याबाबतीत अनेक तज्ज्ञांनी आपले विचार व्यक्त केलेले आहेत. आज भारत जगामध्ये ज्याप्रमाणे लोकसंख्येत चीनपाठोपाठ दुस-या स्थानावर आहे त्याप्रमाणे मोबाईल  वापरकर्त्या संख्येनुसार चीननंतर दुस-या स्थानावर आहे. मोबाइलच्या अतिवापराचे शारीरिक मानसिक आरोग्यावर प्रतिकूल, गंभीर परिणाम होत असतात. मूळ मुददा असा आहे की मोबाईल चा वापर हा कशासाठी होतोय आणि किती प्रमाणात होतोय हे तपासणे महत्वाचे आहे. जर तुमच्या व्यवसायाच्या क्षेत्रातील, करियरच्या संदर्भातील माहिती ज्ञान मिळविण्यासाठी ठराविक मर्यादेपर्यंत वापर होत असेल तर नक्कीच चांगली गोष्ट आहे. कारण मोबाईल मुळे मनुष्यास तात्काळ माहिती मिळाल्यामुळे वेळेची खूप बचत झाली आहे. परंतु काहीजण मोबाइलचा अतिरेक करताहेत. ज्यामुळे त्यांच्या शारीरिक, मानसिक अन कौटुंबिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम झालेला आहे. होतो आहे.

मला वाटते माणसानं यासंदर्भात आत्मपरीक्षण करायला हवं. काही प्रश्न स्वत:ला विचारायला हवेत. जसे की दिवसभरात आपण किती तास मोबाईल साठी खर्च करतो? त्यातले किती तास आपल्या करियरसंदर्भात माहितीसाठी असतात? किती वेळ सोशल मिडियासाठी मनोरंजनाच्या नावाखाली देतो? आपल्याला मोबाईल बिना रहावते का? मोबाईल  पाहताना वेळेचे भान आपल्याला असते का? . सारखे प्रश्न स्वत:ला विचारावेत. उत्तरे नक्कीच मिळतील त्यासाठी फक्त प्रामाणिकपणा जपायचा. मोबाईल  हाताळताना डोळे आणि मोबाईल मधील अंतर, मानेची स्थिती, पाठीची स्थिती, डोळयाची स्थिती, पापण्यांची उघडझापेची वारंवारिता, . अनेक गोष्टी आपल्या शारीरिक आरोग्यावर विपरीत परिणाम करत असतात. मला वाटते, आपण इतरांची मोबाईल वापरण्याची एकूण वेळ आणि कारणे शोधण्यापेक्षा आपले स्वत:चे आत्मपरीक्षण करावे. आपण किती वेळ देतो ते पहावे. त्याचे परिणाम पण पहावेत. उत्तर समाधानकारक असेल तर चांगलीच गोष्ट आहे. पण नसेल तर सुधारणा करण्यासाठी लक्ष द्यावे. वेळ द्यावा. शेवटी एकच म्हणावसं वाटतं की मोबाईल आपण वापरायचा. मोबाइलने आपणास वापरता कामा नये. आणि जर मोबाईल  आपणास वापरत असेल तर आपल्या अंधकारमय भविष्याचं खापर आपल्याच डोक्यावर फोडायचे दुस-याच्या नाही²