संवेदनशील मनाचा संयत आविष्कार : ऋतुरंग
डॉ.बी.एम.हिर्डेकर यांचा ‘ऋतुरंग’ नामक कवितासंग्रह अलीकडेच भाग्यश्री प्रकाशन ने प्रकाशित केला आहे. डॉ.हिर्डेकर
यांनी शैक्षणिक क्षेत्रात अनेक वर्षे प्राध्यापक, प्रशासक म्हणून भरीव काम केलेले आहे, करत आहेत. त्यांनी आपल्या
कवितांमध्ये बळीराजा, मजूर, कष्टकरी,महिला,उसतोड कामगार,सामान्य जनता इत्यादींचे
प्रश्न, दु:ख, व्यथा, वेदनांना अभिव्यक्त केले आहे.त्यांचे गेल्या चार-पाच दशकातील
जीवनानुभव आपणास त्यांच्या या कवितांमधून कलात्मक पद्धतीने शब्दबद्ध झालेले दिसून
येतात.जीवन जगत असताना कवी आजूबाजूला घडणाऱ्या बऱ्या-वाईट विविध प्रसंगातून,अनुभवातून जात असतो. संवेदनशीलतेमुळे तो आपल्याबरोबर इतरांच्या
सुख-दुःखात सामील होत असतो. कर्जबाजारीपणामुळे बळीराजाच्या नशिबी आलेले दु:ख, सरकारची
चुकीची धोरणे व फुसक्या घोषणा त्यांच्या कवितेतून व्यक्त होतात. आपण पाहतो की बळीराजाला
अनेक संकटांचा सामना करावा लागतो. अवकाळी पाऊस, दुष्काळ, त्याचबरोबर कर्जापायी झालेली त्याची झालेली दयनीय परिस्थिती ‘नव्या जुन्याचा खेळ बाबा’ ही कविता अधोरेखित करते.
‘नव्याजुन्यात बळीराजा
अडकलेला
सरकार, पाऊस, वीजवाला, अडतवाला
सरकारी घोषणांचा फक्त
गाजावाजा
सारेच वाजिवत्यात त्याचा
बेंडबाजा’
याबरोबरच अवकाळी पाऊस बळीराजाचे कसे जीवघेणं
नुकसान करतो हे ‘पाऊस असा’ या कवितेत स्पष्ट झाले आहे. डॉ.हिर्डेकर यांच्या
कवितांमध्ये शेतकऱ्यांच्या वेदनांना अभिव्यक्त केलेले दिसून येते.‘कष्टाचा भाव’ ही
एक लघु कविता आहे पण अतिशय मार्मिक आहे.‘काम आमचे दाम तुमचे’ कविता कष्टकरी, मजूर वर्गाच्या व्यथांचे, वेदनेचे आतड्याला पिळवटून टाकणारे चित्रण करते.‘कारागीर वाऱ्यावर’ ही कविता कामगार, कारागीरांची
कोरोनामुळे झालेली दयनीय स्थिती, सरकारची चुकीची धोरणे,नीती यावर कडाडून टीका करते.‘मोल माझ्या श्रमाचे मातीमोल ठरवू नका’ अशी कळकळीची विनंती करते.‘तू फक्त नाच’ ही कविता आजचे शिक्षण वास्तव अधोरेखित करते-
‘शिकणारे मुजोर , शिकविणारे कमजोर
नेमणारे चोर ,
वरिष्ठ कामचोर
हाताखालचे चोरावर मोर , तरी म्हणत्यात नाच रे मोरा नाच’
महिलांवर पिढ्यानपिढ्या होणारे अन्याय, अत्याचार
तसेच तिला उपेक्षित, दुर्लक्षित ठेवणे, दुय्यम स्थान देणे हे समाजवास्तव ‘रामाच्या राज्यात’ नावाची कविता व्यक्त करते. मग कवी प्रश्न करतात की ‘रामाच्या
राज्यात सीता का हो वनवासी?’ ‘चेहरे’ कविता चेहऱ्यामागचे ‘चेहरे’
उजेडात आणते. निर्दयी मुलाच्या संवेदनाहीनतेमुळे मायबापाच्या दयनीय
अवस्थेचे चित्रण ‘पुत्र व्हावे ऐसे उफराटे, काळीज हे फाटल फाटे’ हे आजचे वास्तव ‘माय बाप झाले दीन’ कविता व्यक्त करते.‘पाणी, वाणी, नाणी शहरात
सगळच लागलय नासायला’ म्हणत ‘या
शहरांचं काय करायचं?’ ही कविता शहरातील प्रश्न चव्हाट्यावर आणते.‘पक्षांनीही
घेतले मोकळे श्वास’म्हणत कोरोनामुळे लॉकडाऊन मुळे प्रदूषण, गोंगाट, अतिरेक कमी झाला‘अतिरेकाचा अंत’ ही कविता व्यक्त करते.जाती-धर्माच्या
भिंती छेदून निव्वळ माणूस म्हणून जगता आले पाहिजे. ‘जगता येते आनंदाने’ ही माणूसपणाची जाणीव करून
देणारी कविता दिशा देते मानवताधर्म शिकवते ‘वसुधैव कुटुम्बकम’ शिकवते. व्यापक
उदात्त दृष्टिकोन देते. कवी म्हणतात-
‘जगता येते सोडून जात पात,
करता येते कर्म सोडून
आपला धर्म’
‘बॉडी’
कविता मानवी जीवनाची
क्षणभंगुरता, नश्वरता, अहंकार
अधोरेखित करते. प्रतिमांमध्ये जगता कामा नये पद. पैसा यांची क्षणभंगुरता अधोरेखित
करते. शेवटी कवी म्हणतात ,‘आम्ही माणूस कधी झालोच
नाही’.आज सर्वकाही ऑनलाइन झाले आहे. आभासी जगात
वावरणार्या या दुनियेत खरी नाती उरलीच नाहीत. ही सल कवी आभासी जग’ या कवितेत व्यक्त करतात-
‘आभासी जगात, नभाची नाते उरलेच नाही
नुसतेच पळणे ,
घामाने गळणे राहिलेच नाही’
यातील अनेक कवितांचा सूर मानवतावादी आहे.
माणुसकीचा आहे.कवी मानवता धर्म आपल्या कवितेतून व्यक्त करतात.‘माणुसकीचा झरा’ या कवितेत ते म्हणतात ‘मानवता हा एक धर्म खरा, माणुसकीचा निर्मळ वाहू दे झरा’. ‘करुणेचा झरा’या कवितेत कवी आपल्या आई विषयीच्या भावना व्यक्त करतात.तिच्या वाटी आलेलं दुःख,
व्यथा-वेदनामुळे कवीचे मन कासाविस होतं. तिच्या वाट्याला आलेले भोग, दुःख यांनी
कवीच्या मनात प्रश्न पडतात-
‘ मनोभावे निरपेक्ष देवपुजा तिने केली
तरी सजा कपाळी तिच्या कोणी लिहिली?’
एकूणच‘ऋतुरंग’ मधील कविता आपणास अंतर्मुख करतात. त्याचबरोबर जीवन जगण्यासाठी दिशा
देतात. समृद्ध करून जातात. सामाजिक,शैक्षणिक,सांस्कृतिक इत्यादी विविध क्षेत्रातील
प्रश्नांचा, समस्यांचा विस्तृत आशय असलेलेया या कवितांमध्ये भावगर्भता, विचारगर्भता
दिसून येते. साध्या, सहज, सरळ शब्दात पण मनाचा वेध
घेणारी कवीची शैली वाचकाला विचार प्रवृत्त करते. माणसाला माणूसपणाची जाणीव करून
देते. एकूण 107 कविता या काव्यसंग्रहात समाविष्ट
आहेत. त्या श्रमिकहो, समाजभान, ‘ती’ च्या शक्तीचा जागर, सृजन, शिक्षण, करुणेचा झरा, जिव्हाळा अशा विविध भागात विभागल्या गेल्या आहेत. प्रत्येक
भागाच्या प्रारंभी महान व्यक्तींच्या काही ओळी आहेत व त्याचबरोबर चित्रे (स्केचेस)
आहेत.डॉ रणधीर शिंदे यांनी आशयघन ब्लर्ब लिहिला आहे तरडॉ.रघुनाथ कडाकणे यांनीडॉ हिर्डेकर यांच्या व्यक्तिमत्वाचा
आणि कवितांचे विवेचन व विश्लेषण करणारी प्रस्तावना लिहिली आहे.आकर्षक आणि बोलके मुखपृष्ठ
विजय टिपुगडे यांनी रेखाटले आहे.सदर काव्यसंग्रह मराठी साहित्य वैभवात
मोलाची भर घालणारा आहे हे मात्र निश्चित .....!
पुस्तकाचे नांव : ऋतुरंग (कवितासंग्रह)
लेखक :डॉ.बी एम हिर्डेकर
प्रकाशक: भाग्यश्री प्रकाशन, कोल्हापूर
पॄष्ठे : 152
किंमत:150 रू

